This is a Marathi translation by Avadhoot of “Plotting & Scheming: Constructing Sandhurst Road in Colonial Bombay, 1898-1925”.
‘सेंटर फॉर स्टडीज् इन सोशल सायन्सेन (सीएसएसएस), कोलकाता’ इथं ३ मार्च २०१७ रोजी मी दिलेल्या व्याख्यानाचा हा गोषवारा आहे. प्राध्यापक लक्ष्मी सुब्रमण्यम व डॉ. प्राची देशपांडे हे इतिहासकार या कार्यक्रमाचे यजमान व अध्यक्ष होते. ‘एम्पायर’स् मेट्रॉपलिस: मनी, टाइम अँड स्पेस इन कलोनिअल बॉम्बे, १८६०–१९२०’ या माझ्या आगामी पुस्तकातील दोन प्रकरणांवर हे व्याख्यान आधारलेलं होतं.
आशियातील ब्रिटिश साम्राज्याच्या बंदरांवर १८९०च्या दशकाच्या अखेरीला गाठीच्या प्लेगाची साथ पसरली. यामुळं साम्राज्यवादी सत्तेचं प्रभुत्व व नियंत्रण असलेल्या नागरी केंद्रांमधील असुरक्षिततेला नाट्यमय वळण मिळालं. कलकत्ता व मुंबई यांसारखी वासाहतिक शहरं प्रादेशिक व जागतिक पातळीवर लोक, पैसा व यंत्रं यांच्या दळणवळणाची प्रवेशद्वारं होती. वाफेची इंजिनं, रेल्वे आणि वीज यांच्या जाळ्यातून या शहरांचं केंद्रीकरण झालं होतं व त्यांना चालनाही मिळत होती. व्यवसाय आणि राजकारण या दोन्हींचा अंतःप्रवाह व्यापाराचं स्वातंत्र्य व कायद्याचं राज्य असा होता. या शहरांमध्ये वासाहतिक सत्ताधारी, भारतीय उच्चभ्रू आणि नागरी जनता यांच्यात सत्तेचं वाटप झालेलं होतं आणि सत्तासंघर्षही त्यांच्यातच होत असे.
प्लेगच्या साथीमुळं विसाव्या शतकातील मुंबईमध्ये सामाजिकदृष्ट्या व स्थलावकाशदृष्ट्या कोणते बदल झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न माझ्या सादरीकरणात केलेला आहे. पूर्व व पश्चिम भागांना जोडणाऱ्या सँडहर्स्ट रस्त्याच्या बांधणीसंदर्भात हा अभ्यास केलेला आहे. १९५५ सालापासून ‘सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) मार्ग’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचं आधीचं नाव मुंबई प्रांताचा ब्रिटिश गव्हर्नर सँडहर्स्ट याच्यावरून ठेवलेलं होतं. १८९६ साली पश्चिम भारतातील गाठीच्या प्लेगची साथ निवारण्यासाठी ‘बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट’ (बीआयटी) या संस्थेची स्थापना याच सँडहर्स्ट यांनी केली.
सक्तीचं भूसंपादन, भूमी निर्मूलन, झोपडपट्टी उठाव अशा क्रूर अधिकारांपासून ते नवीन इमारती बांधणं, रस्ते रुंद करणं आणि प्लेगच्या पार्श्वभूमीवर वासाहतिक मुंबई शहराचं लसीकरण करणं इत्यादी अधिकार वासाहतिक राज्यसंस्थेनं बीआयटीला दिलेले होते. शहरातील रस्तेजाळ्यामध्ये मोकळीक आणून अभिसरण वाढवण्यासाठी झोपडपट्ट्या, पाठथळ भाग व रस्ते ताब्यात घेऊन, जमीनदोस्त करून त्यांचा पुनर्विकास बीआयटीनं केला.
बीआयटी ही संस्था तिच्या स्थापनेनंतरच्या दशकभरामध्येच वासाहतिक मुंबईतील सर्वांत मोठी जमीनमालक बनली. मोठ्या प्रमाणात भूपट्टे संपादित घेतल्यावर नवीन ‘योजनां’साठी त्यांचं आलेखन करण्याचं काम बीआयटीनं केलं. अर्थात, या प्रक्रियेमध्ये जमीनदार व भाडेकरू, मंदिरं व मशिदी आणि दुकानमालक, थिएटरं व खाणी या घटकांकडून बीआयटीच्या उच्चाधिकाराला कायदेशीर व तांत्रिक स्वरूपाची खर्चिक आव्हानंही देण्यात आली.
‘बाजारपेठीय मूल्य’ आणि वासाहतिक न्यायालयांमधील मोजणीच्या पद्धती व मूल्यांकनं या व्हिक्टोरियन संकल्पनांच्या माध्यमातून या घडामोडी घडल्या. त्यामुळं पूर्वी नागरी पर्यावरण–प्रदेशाचं मूल्यांकन मालक्कीहक्क व वापराच्या संयुक्त साखळीद्वारे होत होतं, त्याची जागा आता गृहिताधारित रोकड मूल्यांनी घेतली. त्यामुळं अनुमान–पद्धतीला चालना मिळाली आणि वासाहतिक मुंबईमध्ये नवीन तर्क व राजकीय अर्थव्यवस्थेचं सार्वत्रिकीकरण झालं. नागरी जमीन–बाजारपेठेतील या परिवर्तनाची तपासणी मी केली आहे. सँडहर्स्ट रस्त्यावरील बीआयटीची योजना क्रमांक तीनची घोषणा १८९९ साली झाली, जमीन संपादित करण्याची सूचना १९०२ साली निघाली आणि हा रस्ता १९१० साली पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या प्रक्रियेत भारतीय दावेदारांनी बीआयटीविरोधात विविध लवादांमध्ये आणि न्यायालयांमध्ये लढवलेल्या प्रकरणांच्याद्वारे मी ही तपासणी केली आहे.
या रस्त्यावरील दावेदारांनी भूसंपादनाविरोधात व अधिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी लढलेल्या खटल्यांमुळं भूसंपादन व मूल्यांकन या संदर्भात आंग्ल–भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये एक नवा पायंडा पडला. जमीन आणि मालमत्ता कायद्यासंबंधीचे या काळातील युक्तिवाद व अर्थनिर्णयनं यांमधून अजूनही वसाहतोत्तर भारत व दक्षिण आशियातील शहरांमधील नागरीकरणाला आकार दिला जातो.