मुंबईतील ६० सुती कापड गिरण्यांपैकी बहुतांश गिरण्या गेल्या २० वर्षांमध्ये बंद पडल्या अथवा त्यांच्या जागेचा पुनर्विकास करण्यात आला. जनतेसाठी कायमच अदृश्य राहिलेला हा प्रचंड वारसा आता शहरातून जवळपास लुप्त झालेला आहे. या गिरण्यांची आवारं अवाढव्य भिंतींनी बंदिस्त केलेली असल्यामुळे आतील भाग नजरेपल्याडच राहायचा, पण २०००च्या दशकात उड्डाणपूल व उंच इमारती उभ्या राहू लागल्यावर नजरेचा टप्पाही पलटला. जागतिक औद्योगिक क्रांतीच्या काळात निर्माण झालेल्या अगदी पहिल्या काही कारखान्यांमध्ये मुंबईतील कापडगिरण्यांचा समावेश होतो. ‘पूर्वेकडील मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या गेलेल्या तत्कालीन बॉम्बे शहरात मध्यवर्ती ठिकाणी या गिरण्यांना जागा मिळाली.
आशियातील ब्रिटिश साम्राज्याच्या बंदरांवर १८९०च्या दशकाच्या अखेरीला गाठीच्या प्लेगाची साथ पसरली. यामुळं साम्राज्यवादी सत्तेचं प्रभुत्व व नियंत्रण असलेल्या नागरी केंद्रांमधील असुरक्षिततेला नाट्यमय वळण मिळालं. कलकत्ता व मुंबई यांसारखी वासाहतिक शहरं प्रादेशिक व जागतिक पातळीवर लोक, पैसा व यंत्रं यांच्या दळणवळणाची प्रवेशद्वारं होती. वाफेची इंजिनं, रेल्वे आणि वीज यांच्या जाळ्यातून या शहरांचं केंद्रीकरण झालं होतं व त्यांना चालनाही मिळत होती. व्यवसाय आणि राजकारण या दोन्हींचा अंतःप्रवाह व्यापाराचं स्वातंत्र्य व कायद्याचं राज्य असा होता. या शहरांमध्ये वासाहतिक सत्ताधारी, भारतीय उच्चभ्रू आणि नागरी जनता यांच्यात सत्तेचं वाटप झालेलं होतं आणि सत्तासंघर्षही त्यांच्यातच होत असे.
प्लेगच्या साथीमुळं विसाव्या शतकातील मुंबईमध्ये सामाजिकदृष्ट्या व स्थलावकाशदृष्ट्या कोणते बदल झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न माझ्या सादरीकरणात केलेला आहे. पूर्व व पश्चिम भागांना जोडणाऱ्या सँडहर्स्ट रस्त्याच्या बांधणीसंदर्भात हा अभ्यास केलेला आहे. १९५५ सालापासून ‘सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) मार्ग’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचं आधीचं नाव मुंबई प्रांताचा ब्रिटिश गव्हर्नर सँडहर्स्ट याच्यावरून ठेवलेलं होतं. १८९६ साली पश्चिम भारतातील गाठीच्या प्लेगची साथ निवारण्यासाठी ‘बॉम्बे इम्प्रूव्हमेन्ट ट्रस्ट’ (बीआयटी) या संस्थेची स्थापना याच सँडहर्स्ट यांनी केली.
रेल्वे, तारायंत्रं व वाफेवर चालणारी जहाजं यांचं जागतिक जाळं ब्रिटीशशासित भारतात आणि जागतिक पातळीवर १८७०–१८८०च्या दशकांमध्ये पूर्ण झालं. या सर्व संदेशन व वाहतूक मार्गांदरम्यानच्या वेळेसंबंधित इशाऱ्यांचं संयोजन करणंही शक्य झालं, कारण अचूक रेखांशीय वेळ मद्रास व मुंबई अशा शहरांमधून एकाच वेळी त्यांच्या विस्तारीत भौगोलिक व समुद्री सीमांपर्यंत विद्युतमार्गे पाठवण्याचं काम निरीक्षणशाळा करत होत्या. पण शहरातील वेळमापन प्रमाणित करण्याच्या प्रयत्नांना नागरी पर्यावरणातील अनेक दृश्य व श्राव्य कालबाधित चिन्हांना सामोरं जावं लागलं: सार्वजनिक घड्याळं, कारखान्यांचे भोंगे, कार्यालयीन पाळ्या, रेल्वेची वेळापत्रकं, सूर्योदय व सूर्यास्त हे घटक होतेच; शिवाय या महाकाय उपखंडात पूर्वेकडे कलकत्त्यापासून ते पश्चिमेतील कराचीपर्यंत स्थानिक सौरवेळा तासाभरापेक्षाही अधिक अंतरानं बदलत्या होत्या.
‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाच्या सप्टेंबर २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी खास त्यांनाच साजेल असं असभ्य विधान केलं होतं: “तुमच्याकडचं स्थावर मालमत्तेचं क्षेत्र अविश्वसनीयरित्या स्वस्त आहे… मुंबई हे महान शहर आहे आणि तरीही तिच्या तुलनेतील इतर शहरांसारखी या शहराची किंमत लावलेली दिसत नाही. उलट दुय्यम महत्त्वाच्या शहरांपेक्षाही मुंबईची किंमत कमी ठेवलेली आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना इथं प्रगतीसाठी प्रचंड वाव आहे.” (श्रीवास्तव २०१४). अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मोहिमेमध्ये त्यांनी ज्या थरावरून शेरेबाजी केली तेवढा मुंबईविषयीचा त्यांचा शेरा वादग्रस्त नव्हता, पण ट्रम्प यांची ही अतिशयोक्ती भारतात मोठी बातमी बनली. वास्तविक भारतामध्ये मुंबईतील घरबांधणी बाजारपेठ देशात सर्वांत महागडं आहे. भारताच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण १९९०च्या दशकामध्ये झालं, तेव्हा मुंबईतील महागड्या स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयीच्या बातम्या नियमितपणे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध होत असत. अनेकदा मुंबईची तुलना भारतातातील दिल्ली, चेन्नई किंवा बंगलोर अशा समकक्ष शहरांऐवजी अधिक संपन्न लंडन किंवा न्यूयॉर्क अशा जागतिक शहरांशी होते.
मुंबईसाठी हे वर्ष वर्धापनदिन, जयंती वगैरेंसारखे अनेक दिवस चुकवणारं ठरलं. १९ जून २०१५ रोजी झालेल्या पावसाने शहर बंद पाडलं आणि शिवसेनेला आपला सुवर्ण महोत्सवी समारंभ रद्द करावा लागला. कित्येक राज्य सरकारांपेक्षाही मोठ्या असलेल्या इथल्या महानगरपालिकेवर गेली दोन दशकं शिवसेनेचीच सत्ता होती, त्यामुळे पावसाने शहर बंद पडल्यावर पक्षाला अनेक प्रश्नांनाही सामोरं जावं लागलं. भारतातील ही सर्वांत जुनी महानगरपालिका एवढ्या अनागोंदीमध्ये का आहे, याचं एक उत्तर सत्ताधारी पक्षाच्या अकार्यक्षमतेमध्ये आहेच, पण त्याहूनही तपशीलवार उत्तर हवं असल्यास विस्मरणात गेलेल्या एका जयंती दिवसाची दखल घ्यावी लागेल. मुंबईच्या महानगरपालिका प्रशासनातील विभागांमध्ये गेल्या दीडशे वर्षांत क्वचित रचनात्मक बदल झालेले आहेत.
Arthur Travers Crawford, first Municipal Commissioner (1865) आर्थर ट्रॉवर्स क्रॉफर्ड, पहिले शहर महागरपालिका आयुक्त (१८६५)
तत्कालीन मुंबई सरकारने १ जुलै १८६५ रोजी पहिले ‘म्युनिसिपल कमिशनर फॉर द टाउन अँड आयलँड ऑफ बॉम्बे’ (मुंबई शहर व बेट महागरपालिका आयुक्त) आर्थर ट्रॉवर्स क्रॉफर्ड यांची नियुक्ती केली. शिवाय आता नगरसेवक म्हणून ओळखल्या जाणारे सदस्य– ‘शांततेचे न्यायदूत’ही याच दिवशी नियुक्त करण्यात आले. तोपर्यंत या बेटरूपी शहराचा प्रशासकीय कारभार त्या त्या कामापुरता आणि अतिशय अल्प हस्तक्षेप करणारा होता. पोलीस प्रशासन व मच्छिमारी आणि नाविक व्यवहार असोत की रस्ते स्वच्छ व सुके ठेवण्यासाठीची कार्यवाही असो, यांपैकी कशासंबंधीही पुरेसे अधिकार न्यायदूतांकडे नव्हते. प्रशासकीय निधी तीन आयुक्तांच्या अखत्यारित येत असे आणि हे प्रशासकीय ‘त्रिकूट’ अनेकदा एकमेकांच्या विरोधी जाणाऱ्या कारणांसाठी कार्यरत राहायचं.
नेहरू आणि पटेल यांच्या सरकारने स्वातंत्र्यानंतरही सुभाषचंद्र बोस यांच्या एकत्रित कुटुंबावरती पाळत ठेवायच्याच सूचना केल्या होत्या असे नव्हे, तर आझाद हिंद सेनेमध्ये (इंडियन नॅशनल आर्मी–आयएनए) सामील झालेल्यांपैकी अनेक माजी सैन्याधिकारी व नेत्यांवर पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. केंद्रीय व राज्य पातळीवर मंत्री म्हणून काम केलेल्या काही मान्यवर मुंबईकर व्यक्तिमत्त्वांचाही यात समावेश होता.
Jawaharlal Nehru and Gen Jagannath Rao Bhosale, ex-Chief of Staff of Bose’s Indian National Army and later Union Minister for Rehabilitation (Bombay Chronicle, May 1946)जवाहरलाल नेहरू व बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ आणि नंतर केंद्रीय पुनर्वसन मंत्री झालेले जनरल जगन्नाथराव भोसले. (बॉम्बे क्रॉनिकल, मे १९४६)
काँग्रेस भवनामध्ये १९४६ साली स्थापन झालेल्या आझाद हिंद सेना दिलासा व चौकशी समितीच्या (रिलीफ अँड इन्क्वायरी कमिटी) मुंबई शाखेचे नेतृत्त्व जगन्नाथराव के. भोसले आणि एस. ए. अय्यर यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल हे या समितीचे अध्यक्ष आणि पुरस्कर्ते होते. फाळणी काळातील निर्वासित आणि दुसऱ्या महायुद्धातून परतलेले सैनिक यांच्यासंबंधी केलेल्या कामासाठी भोसले ओळखले जातात आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी मंत्रालयाजवळच्या एका रस्त्यालाही त्यांचे नाव देण्यात आले. आझाद हिंद सेनेमध्ये भोसले हे नेताजींचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ होते आणि १९५२ पासून त्यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात पुनर्वसनाचे केंद्रीय उपमंत्री म्हणून काम पाहिले.
अय्यर हे सप्टेंबर १९४६पासून १९५१पर्यंत मुंबई सरकारचे माहिती संचालक होते. त्यानंतर ते सेन्सॉर मंडळाचे सदस्यही झाले. मुंबईत १९१८सालापासून पत्रकारितेत कार्यरत असलेले आणि ‘रॉयटर्स’ व ‘असोसिएट प्रेस इंडिया’ या वृत्तसंस्थांचे पहिले भारतीय अध्यक्ष राहिलेल्या अय्यर यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बँकॉकहून युद्धाचे वार्तांकन केले होते. त्याच काळात ते बोस यांचे जवळचे सहकारी बनले आणि ऑक्टोबर १९४३मध्ये नेताजींच्या ‘आझाद हिंद सरकार’चे प्रचार मंत्री व युद्ध मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली.
S.A. Ayer, Propaganda Minister of Bose’s Provisional Govt of Free India, and later Publicity Minister of the Govt of Bombayएस. ए. अय्यर. बोस यांच्या हंगामी आझाद हिंद सरकारमधील प्रचार मंत्री व नंतर मुंबई सरकारमध्ये प्रसिद्धी मंत्री म्हणून काम.
ब्रिटिशांच्या सत्तेखालील सिंगापूरचा १९४२मध्ये पाडाव झाल्यानंतर सुमारे ५० हजार भारतीय युद्धकैदी बनले आणि त्यापैकी सुमारे २५ हजार सैनिक आझाद हिंद सेनेमध्ये दाखल झाले होते. त्यातील काहींना आझाद हिंद सेनेत सैनिक म्हणून काम केले तर काहींनी अंदमानस्थित आझाद हिंद सरकारमध्ये नागरी सेवेत योगदान दिले. ऑगस्ट १९४५मध्ये दुसरे महायुद्ध संपत आले असताना अणुबॉम्बच्या हल्ल्यामुळे जपानने तत्काळ शरणागती पत्करली आणि त्यानंतर काही दिवसांनी सुभाषचंद्र बोस यांचा गूढ मृत्यू झाला. त्या दरम्यान थकलेल्या व बंडखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय सैन्याला मित्र राष्ट्रांनी (व तत्कालीन वसाहतवाद्यांनी) माउंटबॅटनच्या अखत्यारितील आग्नेय आशियाई प्रदेशावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी धाडले; या मोहिमेला ‘इंग्लंडच्या आशियाई वसाहती बचाव’ असे अपमानास्पद नाव देण्यात आले.
‘‘आपले काम सुरळीत पार पडायचे असेल, तर आवश्यक वाटेल तिथे आणि गरज भासल्यास बळाचा वापर करून मंदिरे हटविणे अत्यंत निकडीचे आहे. या आवश्यकतेवर मी आणखी उहापोह करण्याची गरज नाही. मी एखादी योजना आखताना कोणत्याही धार्मिक स्थळाची जागा त्यातून वगळतो. परंतु हिंदू मंदिरांच्या बाबतीत, सर्व स्थळे वगळणे शक्य नाही, कारण ती शहरभर गवतासारखी पसरलेली आहेत. आपल्या योजनांना बाधा यायला नको असेल, तर आपण यातील प्रत्येक स्थळाचा स्वतंत्रपणे विचार करायला हवा.’’
‘मुंबई शहर सुधारणा विश्वस्त संस्थे’च्या (द बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट) विशेष बैठकीच्या कामकाजातून, १५ जानेवारी १९०७, टी.आर.११.
सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) मार्गावरील नागेश्वर मंदिर हे मुंबईतील सर्वांत जुने शंकराचे देऊळ आहे. दर वर्षी महाशिवरात्रीच्या सप्ताहात भक्तमंडळी इथे येऊन प्रार्थना करतात. ‘गोल देऊळ’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात स्वयंभू शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या फारच थोड्या लोकांना हे मंदिर गर्दीच्या या मुख्य रस्त्यावर कसे उभे राहिले याची माहिती असेल. १९५५ पूर्वी सँडहर्स्ट रोड या नावाने हा वर्दळीचा रस्ता ओळखला जायचा. पश्चिम भारतात १८९६ साली आलेल्या प्लेगच्या साथीला सरकारच्या वतीने हाताळणाऱ्या गव्हर्नर सँडहर्स्टवरून हे नाव देण्यात आले होते. लॉर्ड सँडहर्स्ट यांनी या साथीच्या पार्श्वभूमीवर १८९८ साली शहराचे निर्जंतणुकीकरण करण्यासाठी बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची (बीआयटी) स्थापना केली. शहराच्या वाहतूक मार्गांमध्ये मोकळीक आणण्यासाठी व झोपडपट्ट्या, दलदलीची ठिकाणे, रस्ते यांचा पुनर्विकास करून हे मार्ग अधिक प्रवाही करण्यासाठी या विश्वस्त संस्थेला अधिग्रहण, पाडकाम व पुनर्विकासाचे राक्षसी अधिकार देण्यात आले.